तीला जाऊन आज २९ सप्टेंबर २०१० ला अकरा वर्ष होतील , अजूनही ती आठवली कि डोळ्यासमोर तरळते ती धूसर मूर्ती ..
आणि एक तप्त अश्रू गालावरून ओघळतो .
अखेरची आठवते ती . . कापसासारखे निर्जीव भूरभूरणारे केस,शांतपणे बंदिस्त झालेले तिचे डोळे,एका भिंतीच्या आधारे बसवले गेलेले तिचे कलेवर . .
जयूताई ...!! चार शब्दात संपणारे तिचे नाव . . पण अस्तित्व? कायमचेच संपलेले आहे ..पण आठवणी मात्र कधीही न संपणारया. .
ती गेली आहे शांतपणे तिच्या मार्गाने ,कधीही परत न येण्यासाठी . .
माझ्या वयाच्या साडेतीन महिन्यांपासून मला सांभाळायला असणारी जयूताई. .!!
तिच्या अखेरच्या क्षण पर्यंत मला सांभाळणारी जयूताई ..!!
आई,बाबा कामाला जाताना जिच्याकडे विश्वासाने मला सोडून जात ती जयूताई ..!!
जातीच्याही पलीकडे जाऊन एक मायेचा ,विश्वासाचा बंध निर्माण करणारी ती जयूताई..!!
माझ्या न कळत्या वयात तिनेच मला जपल ,माझी अल्लड वयातली सगळी छोटी मोठी सुख,दुख तिने जपली .
तिच्याबरोबर खूप वेळा लुटुपुटुचे भांडण व्हायचे आणि दोन क्षणांनी तीच लागायची ..
प्राथमिक शाळेतली मैत्रिणीबरोबर भांडण, छोटे मोठे रुसवे फुगवे मी तिलाच सांगायचे ,
मी माझ्या त्या दुखांचे ओझे दप्तरासकट तिच्यावर सोपवायचे कि पुन्हा भांडायला रान मोकळे. .
तिच्या घरीहि मी बरेच वेळा जायची ,ती मांसाहारी पण कधीही माझ्या शाहाकारीपणाला तिने धक्का लागू दिला नाही
आजीच्या(तिची आई ) लोखंडी पेटीतून १० पैसे घेऊन त्याच्या फुकनळ्या आणून
त्या ५ फुकनळ्या पाच बोटात अडकवून खाल्ल्यात मी ..एकही तीला ,तिच्या घराच्याना न देता.. आता आठवल की हसू येत स्वत:वर . .
शाळेतून घरी आल्यावर बरयाच वेळा माझ्या भेळेचा हट्ट हि तीने आपल्या पैशातून पूर्ण केलाय
घरी आई , चार बहिणी ,दोन भाऊ ..बहिणी पण धुणी भाडी करणाऱ्या ,एक भाऊ वकिलांकडे शिपाई ,परिस्थिति यथा तथाच..
पण तिच्या गरिबीची झळ मला त्या वयात कधीही लागली नाही, याच मला प्रचंड वाईट वाटत आता .
ती माझे सर्व हट्ट पुरवत असे ..
मग ती भेळ,खारे शेंगदाणे असो किंवा जत्रेतील खेळणी असो . .
तिच्याकडून हे सर्व करून घ्यायचे हा माझा अधिकारच असे आणि ती हि तो न बोलता मान्य करायची ..
आम्हाला ती कामवाली, सांभाळणारी आया कधीच वाटली नाही कारण तिच्या मायेने त्या मर्यादा कधीच धूसर झाल्या होत्या
ती अलगदपणे आमच्या घराच्या त्रिकोणाची चौथी बाजू बनली होती..
बाबा तर तिला गंमतीने जयुताई म्हणजे पंतप्रधान म्हणत असत . .
या १३ वर्षाच्या काळात माझ्या बरोबरच आई,बाबा ,नातेवाईक , शेजारी,शिक्षक ,मैत्रिणी साठी सुद्धा ती " जयूताई " झाली होती,ते माझ्या आणि तिच्या जोड गोळीला चिडवत हि कि कधी सोडणार ग तू विस्मयीला? , मला असा राग यायचा, वाटायचं ह्यांना काय करायचंय , ती सोडेल नाहीतर राहील माझ्याजवळ ... ती मात्र हसायची ..
मला फार भीती वाटायची तेव्हा कि खरच ही नाही ना सोडून जाणार मला ??
मला ती फक्त माझीच अणि माझी वाटायची , माझ्याकडे लक्ष नाही दिल तिने तर नाकावर राग यायचा आमच्या ..
आता कळतंय ती माझी तिच्याबद्दल वाटणारी ओढ़ होती . .
ती सुरवातीला माझ्या चुलत भावंडाना सांभाळायला होती ,नंतर मला.. त्यामुळे ती आमच्या कुटुंबातलीच एक होती ..
एकदा बालवाडीत असताना केवळ ती रेनकोट आणायला विसरल्याच वाटून मी भोकाट पसरलं होत,ती मात्र त्या मुसळधार पावसात आपली जुनी छत्री घेऊन माझा रेनकोट हातात धरून वर्गाच्या बाहेर शांतपणे उभी होती .
माझ्या डोळ्यासमोर तिची अनेक रूपे उभी राहिली..
तिसरीत असताना माझी चप्पल शेणात बुडाली तेव्हा ती काढून धुणारी जयूताई,
आणि बिनदिक्कत पणे पाय वर करून तीला चप्पल काढून देणारी मी ...
दर १४ एप्रिल ला पुढच्या वर्षी मी तुला सांभाळायला नाही म्हणत राहणारी ती ,
संध्याकाळ झाली कि पुरया घाणेकर आळीत फुल शोधायला ती बाहेर पडणार आणि तिच्या मागून मी ...
मोठी झालीस कि विसरशील म्हणणारी ती,रस्त्यात दिसलीस कि " ढू " दाखवून जाशील म्हणणारी ती...,
विस्मयी खूप अभ्यास कर छान मार्क मिळव म्हणणारी ती ,आणि दर वर्षी result लागला कि दुध कोल्ड्रिंक पिऊन आनंद साजरा करणाऱ्या आम्ही ..,
आणि अश्यातच मी दहावीला असताना तो दिवस उजाडला .उजाडला कसला आयुष्यातील एका बाजूला अंधारच घेउंन आला .कधीही जास्त आजारी न पडणारी ती दवाखान्यात आसन्नमरण अवस्थेत होती.. डॉक्टरांनी निदान केल " cancer "...
आपल्या रोगाची कल्पना नसणारी ती माझ्या डब्याची चिंता करत होती ,ती नसल्याने आईची होणारी गैरसोय ती पाहत होती .
पण cancer च्या जीवघेण्या ,भयानक आजाराने तिचे शरीर पोखरत चालेल होते.तिलाही आता अखेरच्या क्षणाची चाहूल लागली होती .तिच्याजवळ गेल्यावर तिचे कोरडे ,निस्तेज डोळे बघावयाचे नाहीत ,सारख पाणी पाणी ओरडणारया तीला नाही पाहावयाच नाही ... ICU तून बाहेर आल्यावर तिचा दिवसेंदिवस कृश होणारा देह त्वरेने कमी होणारे वजन ,घरच्यांच्या समाधानासाठी केलेल्या operation मुळे आणीच निस्तेज झालेली ती ....
लहानपणी माझ्या मनावरचे ओझे तुझ्यावर टाकून मी निर्धास्त होत असे ,आज मात्र माझ्या मनावर रुखरुखीचे ओझे टाकून ती निघून गेली, माझा दहावीचा result सुद्धा तीला ऐकायचा होता तो तीला कसा सांगणार आता ?माझ्या पेक्षा तुला दसपटीने होणारा आनंद मी कसा पाहू ग आता ?? कोणत्या आकाशी शोधू तुला? ?
तू मला चिडवायाचीस मोठी झाल्यावर मी तुला ओळख देणार नाहीस,तुझ्या लग्नाची साडी घेतल्याशिवाय मी जाणार नाही ,मग का गेलीस अशी वचनाला न जगता?मी नसते ग विसरले तुला कधीच . . का मला जन्मभराची रुखरुख लावून गेलीस ?
मला मिळालेले छोटुस यश, चिटुकली नोकरी यांचा आनंद मी तुला कसा सांगू ग . . ??
कुठे भेटशील मला आता परत तू . . ??
आवर्जून काही सांगायचेच होते
पण नाजूक त्या क्षणांना ओठात शब्द विरले. .
डोळे भरून तुजला पाहायचेच होते
आनंद मज मनीचा तुज सांगायचाच होता ..
एकाच त्या क्षणाने पुरताची घात केला
अश्वत्थाम्याची जखम, मन जन्मभर वाहणार आता .
मी वाहणार आता . . . . ..
hats off to your jayutai. dolyatun pani aal. mast lihilas. mi aaj tuza nahi jayutaicha fan zaloy. keep it up
ReplyDeletehmmmmmmm...... Huhhhhhhh...... aswasth jhalo wachun.. chhan lihilays... She was a gem! She has not died; we have kept her alive.. like this... :)
ReplyDelete"एकाच त्या क्षणाने पुरताची घात केला
ReplyDeleteअश्वत्थाम्याची जखम, मन जन्मभर वाहणार आता .
मी वाहणार आता . . . . .. !!"
Just awesome....!!
Really hats off!!
Thnks...
ReplyDelete