Thursday, June 28, 2018

                                      असाही एक सत्यवान ...


       अण्णा आणि आजीला कधी भांडत असलेले पाहिलं असं मलातरी आठवत नाही पण कधी शिळोप्याच्या, सुख दुःखाच्या गप्पा मारतानाही  पाहिलं नाही. माझ्या आठवणीतले अण्णा म्हणजे वेग वेगळया पध्दतीने काहीतरी बनवून आळीभर  वाटणारे ,आणि आज्जी म्हणजे अतिशय गबाळी,अस्वच्छ .. अण्णा कुठेतरी सरदार भवन मुंबईत आचारी म्हणून कामाला होते हे कधीतरी त्यांच्याच गप्पातून ऐकलेले पण ते कधी परत आले,कधी त्यांनी ते काम सोडलं हे सगळं त्या वयात न कळलेलं आणि कळायला लागलं तेहवा कुणी नव्हतंच त्यांच्यातलं.
       चाळीतल्या त्यांच्या दोन खोल्यात आजी खानावळ चालवायची त्यातच आम्ही दोन तीन मुलं सांभाळायला ठेवलेली. म्हणायला दोन खोल्या पण मध्ये लाकडाचा पार्टिशन आणि दार म्हणजे एक पडदा, ओटा  आयुष्यात  कधी धुतला नसेल आणि त्या बाजूच्या फडताळाकडे कधी नजर सुद्धा गेली नसेल, त्याच्या बाजूला कोपऱ्यात एका मोडक्या मखरात चार देव कधी फुल मिळाली तर घातली नाही तर असेच. अण्णा कधी कधी पूजा करताना मी लुडबुड करायचे तिथे. ओट्याच्या बाजूला एक मोरी .. संपलं स्वयंपाक घर. बाहेर एक आरामखुर्ची, एक बाजलं आणि त्याच्या समोर आगगाडी सारखी दुसरी खाट जोडलेली समोरच्या भिंतीवर एक मुलाच्या मुंजीतला एकुलता एक फोटो त्यांच्या तरुणपणीच सुखाचं चित्र दाखवणारा आणि त्याच भिंतीला एक दार शेजारच्या घरात उघडणारं त्यावर माधुरीचा एक मस्त फोटो आणि बाजूला एक फडफडणारं  कालनिर्णय ...
            अश्या ह्या अस्वच्छ घरात मला सांभाळायला ठेवलं ते केवळ आईला पोस्टांपासून जवळ हाकेच्या अंतरावर म्हणून.अण्णा कधी पुदिन्याची चटणी कधी शिजलेल्या बीटाची कोशिंबीर कधी कवठाची बर्फी असं काही करून सगळ्यांना वाटत असत त्या दिवशी त्यांचा सगळा  वेळ हे असं वाटण्यात  जाई. आईने  तर त्या पुदिन्याच्या चटणीच्या वासाने बरेच वर्ष पुदिना आमच्या घरात आणला नाही पण अण्णांचे ते पदार्थ किती जणांनी खाल्ले असतील हा मला  पडलेला प्रश्न अजुनही  अनुत्तरीत आहे. त्यांच्याकडे एका कोनाड्यात एक बाटली असायची मेंथोलची, काचेसारखे काही तुकडे..  एखादा खाल्ला तर गारेगार वाटायचं आणि त्याच्या बाजूला तपकीर ची डबी .. लहान वयात त्याच मला फार कुतूहल असायचं .. प्लास्टिकच्या फुटक्या बादल्या  वितळवून त्या त्यांच्या फाटलेल्या बुटाला जोडणं हा त्यांचा आवडता उद्योग दुसरं काही काम नसल म्हणजे अण्णा हमखास अंगणात बसलेले असायचे आणि बाजूला आम्ही .. कुणाचे नवीन चप्पल आले कि ते स्वतःच्या पायात घालून बघणे हा अण्णांचा आवडता छंद .. माझे प्रत्येक नवीन चप्पल ह्या दिव्यातून जाऊन यायचे.  "अहो अण्णा,बूट फाकतील आणि नंतर आम्हाला होणार नाहीत. "हे आमचा ओरडणे  त्यांना ऐकू पण यायचं नाही अश्या वेळी. कुठलीही वस्तू दुरुस्त करणे म्हणजे अण्णांचं अत्यंत आवडीचं काम आणि त्यांना ती कधी दुरुस्त करायला जमलीय हे मी तरी पाहिलं नाही, शेवटी सगळे पार्टस गुंडाळून दुकानात न्यायचे  हे ठरलेले. आमच्या घरात तर एखाद्याने वस्तू दुरुस्त करायला घेतली कि तुझे अण्णा नाही ना होणार असं म्हणतात. अण्णा राजगजिऱ्याचे लाडू करायचे रवीला फडकं बांधून राजगिरा फोडायचा  मग गुळाचा पाक घालायचा मग ते ,जयूताई आणि कोणी असेल मदतीला कि ते सगळे लाडू वळायचे कदाचित हे सगळं पाहिलं असल्याने मी आयुष्यात कधी ह्या लाडवांना हात पण लावला नाही पण लाडू विकून आलेले सगळे पैसे मोजणे आणि १,२,५,१० अश्या नोटा नीट ठेवणं हे माझं काम .. अण्णा झोपले कि त्यांच्या नाकात रुमालाच टोक घाल, अण्णा बोळातून येत असले कि गजाच्या छोट्या खिडकीतुन त्यांना वॊव  ओरडुन घाबरव, सांभाळायला असलेल्या तिघीं पैकी एक त्यांची लाडकी म्हणून त्याच्याशी भांडण, बालबुद्धीने आपण त्यांच्या नावडत्या  ह्या रागाने  राजगिऱ्याच्या लाडू विकून आलेल्या पैशातले खराब,जुन्या  नोटा, नाणी अण्णांना आणि चांगल्या आजीला दे..   एक ना अनेक आठवणी ...
        अण्णा आणि आजी मिळून कधी बसलेत आणि एखाद काम करत आहेत असं मला पहिल्याच आठवत नाही अण्णांचा पंथ निराळा आणि तिचा निराळा ..ती घरात कधी नसायचीच कुठे मूल सांभाळायला  जा ,पोळ्या कर आणि काही काम कर ..अण्णा आपले घरात .. पण ह्या अस्वच्छ आजीच्या हातात मात्र देवाने कलात्मकतेच लेणं  दिलेले ..रेशीम दोरे विणून ती उत्कृष्ट असे रुमाल विणायची कधी घरात असलीच तर तिच्या हातात कायम रुमाल विणायला घेतलेला असायचा . गुलाबी रेशीम धाग्यांचे छान गुलाब आणि त्याला हिरव्या रेशीम लड्यांची पान आणि भोवती पांढरा धाग्याने सर्व एकत्र विणलेला रुमाल आजही मला आठवतो, रेश्माच्या लड्या  उलगडून द्यायला मात्र मी मदत करत असे ..फार भारी वाटायचं तेहवा त्या वयात..आजीकडून तो रुमाल शिकणं  मात्र राहूनच गेलं .. तिळाचा बारीक हलवा आणि त्याचे  दागिने तर तिनेच करावे. देव कोणाच्या पदरात काय टाकील याचा नेम नाही हेच खरं ..
           आजीच्या लाडाने, खोट  बोलण्याने पोटच्या हुशार मुलाला गमावलं ,पुढे तो गेल्यावर त्याच व्यसन लपवल्याने सून आणि नातू हि प्रेमाला पारखे झाले.  कधी ते  दोघे यायचे पण त्यात आत्मीयता नव्हती आणि कधी मनात येईल तेहवा आजीपण जायची त्यांना भेटायला, कधी तिची पत्र लिहिताना ती दोघे कुठे लांब राहतात एवढच कळत होत.आजीच्या ह्या अश्या कधीही जाण्याने आम्हाला सांभाळायला मग ताईचा प्रवेश झाला कधी अण्णांना लाडू वळायला मदतीला,कधी आम्हाला सांभाळायला अशी वर वरची काम करता करता कधी ती त्यांचा उजवा हात झाली हे कळलंच नाही. पुढे अचानक कॅन्सर होऊन ती गेली आणि मग मात्र आजी आजोबाना त्यांचा भाचा त्याच्या घरी घेऊन गेला, तिच्या जाण्याने जणू घरातला एखादा माणूस गेल्यासारखं त्यांनी धीरच सोडला आणि म्हातारपण आलं त्यांना ..
         गावातली माझी शाळा संपली आणि मीही एव्हाना कॉलेजला  जायला लागलेले , शहरापासून थोड्या नव्या भागात आधीच राहायला गेल्याने गावाशी संपर्कहि कमी होत गेला. त्या जागेशी जोडलेले हे धागेच उसवले जणू .
जेमतेम दोन वर्ष ते भाच्याकडे राहिले असतील. एका १५ ऑगस्टला त्यांना भेटायला जायचे ठरले पण जमलेच नाही. त्यांना भेटायचं नशिबात नव्हतं  बहुतेक, कारण दोन दिवसांनी बातमी येऊन धडकली कि आजी बसल्या जागीच २० ऑगस्टला गेली, तिचे अंतिम दर्शन घेणे जमले नाही तिच्या दहाव्याला तरी जाऊ म्हटलं तर पुढची बातमी आली तिला असं गेलेलं पाहून  "बयो ,मला फसवलस " म्हणून  अण्णा आजारी पडले ते शहरातील एका दवाखान्यात होते. अण्णांना मात्र भेटून येता आलं आणि दोन दिवस जातायत तो अण्णा हि २५ ऑगस्टला गेले. पती निधनानंतर पत्नी शोकाकुल होऊन धीर सोडलेली पाहिलं होत,ऐकलं होत पण असं पत्नी मागून पतीने  प्राण सोडणे म्हणजे सावित्री मागून सत्यवानानेच  जाणे ...
       जिवंतपणी त्यांच्यात प्रेम होत का नव्हतं,का कधी त्यांनी दर्शवल नव्हतं, का एकुलत्या एक मुलाच्या अचानक जाण्याने ती दोन माणस वेगवेगळ्या ध्रुवावर जगत होती माहित नाही पण प्रत्येक वटपौर्णिमेला त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही हे मात्र खरं ... आता आठवलं कि वाटत किशोरवयातील १३-१४ वर्ष ही  तीन माणसं माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक होती, माझ्या  शालेय जीवनातील प्रत्येक आठवणीत कुठं ना कुठं ती तिघे होतीच  आणि आता त्या तिघांपैकी कोणीही नसावं ?? जणू माझी ती वर्षेच  कोणी चोरून नेली आहेत, कारण त्यांच्या शिवाय कुठल्याही आठवणी अपूर्णच आहेत आणि राहतील ...