Tuesday, December 11, 2012

चुकवलेल्या वाटा






दुपारी अवेळीच बेल वाजली , आईने माझ्याकडे पाहिले आणि कोण असणार हे समजून आम्ही दोघी हसलो .
मी दार  उघडले, समोर ती दुक्कलच उभी होती, मी  पुन्हा आईकडे  हसून पाहिले.
सरावल्यासारखेच ते दोघे आत आले आणि सोफ्यावर येऊन बसले .
आईपण  उठून खुर्चीवर जाऊन बसली, आतल्या खोलीत झोपलेले बाबाही उठून बाहेर येऊन बसले.
सगळ काही शिस्तीत झाल्यासारखे त्या दोघांनी बोलणे सुरु केले , आणि आम्ही तिघेही हळू हळू त्यांच्याशी संवाद साधायला लागलो .
ते दोघे जुळे , दिसायला अगदी एक सारखे , काळा  पण चमकदार रंग  आणि डोळ्यात तेजाची चमकही एकसारखीच..
फक्त फरक काय तो बोलण्याच्या पद्धतीत .. एक किती सांगू नको किती नको असा बेभान होऊन बोलणारा एक संयमी ,शांत पणे  बोलणारा  .. त्या पध्दती  वेगळ्या असल्या तरी समोरच्यावर तितक्याच सारख्या प्रभाव टाकणाऱ्या .
मागच्या वेळी वाचायला नेलेले पुस्तक एकाने समोरच्या टेबलवर  ठेवले  आणि ते पुस्तक का आवडले , काय आवडल नाही हे सांगायला सुरवात केली . आम्हीही हसून त्यांचे बोलणे ऐकत होतो.
मग आम्हीही तुम्हाला मोठेपणी कोण होयचं अशी ठराविक साच्यातले प्रश्न विचारायला सुरुवात केली.
शांत असणारयाने   मला शिक्षक होयचे आहे मी मास्तर होणार मोठेपणी.. असे उत्तर दिले
अस का  वाटत तुला विचारल्यावर त्याने  " ते आपल्याला  शिकवतात, छान छान गोष्टी सांगतात, कस वागाव हे शिकवतात ,मला शिकवायला आवडते" अशी खूप उत्तर दिली
दुसऱ्या ने  मात्र मी काही शिक्षक नाही होणार मला  डॉक्टर  होयचंय  अस उत्तर दिल

अशीच ती मुल  समोरच्यांकडे आली कि आमच्याकडे येत होती आणि गप्पांनी आम्हाला वेड  लावत होती
त्यांच्यातले ते तेज हे दोघे नक्की काही बनणार मोठेपणी हे सुचवून जात होते,जुळे असून विचारांचे वेगळेपण आम्हाला दिपवून जात होते,यांच्यात काहीतरी spark आहे असे राहून राहून वाटत होते .

पण एक दिवस अचानक कानावर आल कि बापाने दुसरे लग्न केले , मोठ्या मुलीचे १८ वर्ष होते न होते तोवर आपल्या गावाचाच कुणी पाहून लग्न लावून दिले उरले हे दोघजण  ते  खोट बोलतात , शाळेत मस्ती करतात अशा तक्रारी आमच्या  कानावर यायला  लागल्या 
त्या समोरच्या आजीनीही मुलांविषयी हीच तक्रार केली , आम्हाला नाही हो मुल तर अशी वाटत नाही हि वेडी आशा होतीच.
बापाने कुठून वशिला लावला कळला नाही पण बालसुधारक गृहात त्यांना प्रवेश घेतला , तोवर गुन्हेगार चोरी वगैरे  करणारी मुलच पोलीस त्यात भरती करतात असा  आमचा समज होता .वसतिगृह नावाखाली मुल तिथे राहायला गेली.
क्वचित स्व:ताच्या  लहान सावत्र भावाला घेऊन येत होती , तो तर येवढा शैतान कि समोरच्या बैलाची शिंग पकडायला धावायचा आणि हे त्याच्या मागून धावायचे.
कधी तरी सुट्टीला घरी आले कि ती आमच्याकडे येत होती तिथे कसा tv  चालू असतो , बाकी मुलांमुळे अभ्यास होत नाही हे त्यातला एक सांगत होता.पोळ्या ,भात कसा कमी देतात हे सांगत होती .
हळू हळू  त्यांच्या डोळ्यातील त्या तेजाची जागा आता त्या सुधारक गृहातल्या मुलांच्या कुतूहलाने घेतली होती.
ती मुल कशी चोरी करायची, एकाने कस आईला फसवून पैसे चोरले अशी रसभरीत वर्णने आम्हाला ऐकायला मिळत होती  .
 एकदा  तर वाचायला नेलेल्या  पुस्तकच कव्हर  स्व:ता कडे ठेवून  त्यांनी तसाच ते पुस्तक आणून दिल तेह्वा हळू हळू त्यांच्यातला हा  बदल लक्षात येत गेला .
आम्हीही मग त्याचं येण  कमी होईल हे पाहत गेलो .बाहेर जायचं आहे ; नंतर बोलू अशी फुटकळ कारण देऊ लागलो मग त्यांनी दुसर घर घेतल आणि आपोआपच त्यांचा येण कमी होत गेल.
आम्हीही ते ऐकण्या खेरीज दुसर काय करणार होतो? आमच्या मुलांच  आम्ही पाहू हेच ऐकायला मिळाल असत ,आम्ही मुलांसाठी काही करू शकत नाही हि बोच मनाला लागत होती पण शेवटी त्यांच्या नशिबावर सगळ सोडून आम्ही तो विषय सोडून दिला.

  चुकलेल्या वाटांवरून ज्याने कान पकडून वाट दाखवायची त्यानेच त्यांना चुकीच्या वाटेवर आणून सोडलं होत  का ?, त्यांच्या चुकवलेल्या वाटा  त्यांना कुठे नेऊन सोडणार होत्या ? का शोधतील त्यांच्या डोळ्यातल्या तेजाने ते  आपल्या हरवलेल्या वाट परत?

No comments:

Post a Comment